९९ वे साहित्य संमेलन सातार्‍यात   

पुणे : यंदाचे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातार्‍याला होणार आहे. ते आयोजित करण्याचा मान सातार्‍यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाउंडेशनला मिळणार आहे. 
 
साहित्य महामंडळाच्या येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. बैठकीला उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांसह सर्व घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थांचे प्रतिधिनी उपस्थित होते. 
 
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी स्थळ निवड समिती स्थापन करण्यात आली होती. ही समिती निमंत्रक संस्थांना भेट देऊन आली. संमेलनासाठी सदानंद साहित्य मंडळ, औदुंबर, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा इचलकरंजी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी, सातारा या संस्थांकडून निमंत्रणे आली होती. या स्थळांना भेटी दिल्यानंतर स्थळ निवड समितीची काल बैठक  झाली. त्यात सातार्‍याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत स्थळ निवड समितीच्या निर्णयावर महामंडळाने शिक्कामोर्तब केले.     
 
प्रा मिलिंद जोशी म्हणाले, सातार्‍याला ३२ वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान मिळणार आहे. यापूर्वी, १९९३ मध्ये विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली सातार्‍यात संमेलन झाले होते. गेल्या १२ वर्षांपासून महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा सातार्‍याला संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळावी, यासाठी पाठपुरावा करत होती.

स्थळ निवड समिती

या संमेलनासाठी मार्गदर्शन समिती स्थापन करण्यात आली असून त्यात प्रा. मिलिंद जोशी, गुरय्या स्वामी, सुनिता राजे पवार, विनोद कुलकर्णी, प्रदीप दाते, दादा गोरे आणि डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांचा समावेश आहे. 

सातार्‍यातील चौथे संमेलन

सातार्‍यात होणारे हे ४ थे संमेलन आहे. १८७८ मध्ये लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथकार संमेलन सुरु केल्यानंतर ३ रे संमेलन १९०५ मध्ये रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली सातार्‍यात झाले. १९६२ मध्ये न. वि. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली ४४ वे तर १९९३ मध्ये विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली ६६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते.

शाहू स्टेडियमवर होणार 

नियोजित संमेलन स्थळ छत्रपती शाहू स्टेडियम हे आहे. १९९३ मध्ये ६६ वे संमेलन इथेच झाले होते. हे स्टेडियम १४ एकरात असून तिथे मुख्य मंडप, दोन इतर मंडप, ग्रंथ प्रदर्शन, कवी गझल कट्टा, तसेच भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. इतर छोटे कार्यक्रम करण्यासाठी तीन सभागृहे आहेत. स्टेडियममध्ये २५००० प्रेक्षक क्षमता असलेली गॅलरी आहे. हे स्टेडियम सातारा बस स्थानकापासून पायी चालत जाण्याच्या अंतरावर  असून शहराच्या मध्यभागी असल्याने शहरातील आणि बाहेरून येणार्‍या साहित्य रसिकांची सोय होणार आहे. स्टेडियमच्या पाठीमागील बाजूस पोलिस परेड ग्राउंडची ८ एकर जागा असून तिचा वापर पार्किंगसाठी करता येणार आहे.

सातार्‍यातील तीन साहित्य संमेलने... 

पहिले संमेलन : सन- १९०५ 

अध्यक्ष : रघुनाथ पांडुरंग करंदीकर 

रघुनाथ करंदीकर व्यासंगी कायदेपंडीत आणि लोकमान्य टिळक यांचे स्नेही होते. सातार्‍यात वकीली व्यवसायाबरोबरच ते सामाजिक काम करत होते. १८९८ साली त्यांनी ‘सहस्रकर’ नावाचा छापखाना काढला व ‘भारतवर्ष’ आणि ‘प्रकाश’ ही साप्ताहिके सुरू केली. इतिहास व इतिहास संशोधनाची आवड असल्याने त्यांनी मेणवली येथील नाना फडणवीसांचे दुर्मिळ दप्तर मिळवले व त्यातले काही कागद छापून प्रसिद्धही केले. स्वदेशीच्या प्रसारासाठी त्यांनी स्वदेशी व्यापार मंडळ स्थापन केले. १९०५ मध्ये सातारा येथे झालेल्या तिसर्‍या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.  

दुसरे संमेलन : सन - १९६२ 

अध्यक्ष - नरहर विष्णु गाडगीळ 

नरहर गाडगीळ हे व्यासंगी ग्रंथकार व मुत्सद्दी राजकारणी होते. १९६२ साली सातारा येथील ४४ व्या मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. संमेलनात त्यांनी साहित्य व शासन यांचा समन्वय, राज्यपुनर्रचना समिती, सीमावाद, गोवा स्वतंत्र राज्य नको या विषयांचा परामर्श घेऊन साहित्यातील स्वातंत्र्यावर टीका केली. अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले होते की, साहित्य ही उपासना आहे, वासना नाही. ती वासना झाल्यास साहित्य अवनत होते. साहित्यातील आनंद हा निरपेक्ष आहे. त्याचप्रमाणे भाषण-स्वातंत्र्य व लेखनस्वातंत्र्य हे मौलिक स्वातंत्र्य आहे; पण कोणलाही गुण अतिरेकाला गेला  तर तो दुर्गुण ठरतो, त्याप्रमाणे अमर्याद भाषणस्वातंत्र्य व अमर्याद लेखनस्वातंत्र्य स्वातंत्र्याचाच शत्रू ठरते. 

तिसरे संमेलन : सन - १९९३

अध्यक्ष - विद्याधर गोखले 

विद्याधर गोखले हे श्रेष्ठ पत्रकार, संपादक व  नाटककार होते. त्यांचे लेखन मात्र रंजकतेकडे अधिक झुकणारे होते. राजकीय लेखनही ते साहित्यिक शैलीने नटवत असत. लेखन सालंकृत करण्यावर त्यांचा अधिक भर  होता. संस्कृत व उर्दू साहित्याचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. त्यातील वचने व कल्पना ते आपल्या अग्रलेखात वापरत असे. सरळ, सुबोध अशा त्यांच्या लेखनात विनोदाचा शिडकावाही असे. प्रक्षोभक लिहिण्यापेक्षा मुद्द्यांकडे, भाषेच्या व शब्दांच्या नेटक्या वापराकडे त्यांचा कल होता. १९९३ मध्ये सातारा येथे झालेल्या ६६ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली. 
 

Related Articles